अनेक तज्ज्ञांच्या मते आजचे युग हे संवाद क्रांन्तिचे युग आहे. एकमेकांशी संवाद साधण्याकरिता कधीही नव्हती इतकी साधने आज मानव जातीला उपलब्ध आहेत. परंतु जरा खोलवर विचार केला असता जाणवते की साधनांच्या निर्मितीत साध्यच कुठेतरी हरवून गेले आहे. संवाद या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द आहे Communication जो लेटिन भाषेतील Communis या शब्दा पासून तयार झाला. Communis म्हणजे to share तसेच परस्पर देवाणघेवाणीतून समाज बांधणे to build Community. यातून संवादाचे साध्य स्पष्ट होते. आपण संवाद नाती बांधण्यासाठी करतो. विविध व्यक्तिंना एकत्र करण्याचे माध्यम म्हणजे संवाद.
साधने असूनही जागतिक स्तरावर विसंवाद दिसण्याची कारणे आर्थिक, राजकीय तसेच सामाजिकही आहेत. परंतु आपल्या भोवतीच्या नात्यांच्या छोट्या परिधि मध्ये तरी आपल्याला संवाद दिसतो का ? काही समाजशास्त्रज्ञांच्या मते आज अनेक पारंपरिक संस्थाचे, नात्यांवे विघटन होत आहे. परंतु असे वाटते की नाती बांधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची आन्तरिक उर्मी प्रत्येक माणसांत असते. तिच्या प्रकटीकरणाचे स्वरूप, कौशल्ये बदलू शकतात व बदलेल्या परिस्थितीत जर संवाद-कौशल्याची जाणीव झाली तर अनेक नात्यांमध्ये पुनश्च सुसंवाद जागा होऊ शकतो.
मूल जन्माला येतं ते संवाद साधतं. आपल्या रडण्यातून ते आपली खाण्याची, रक्षणाची, प्रेमाची गरज व्यक्त करतो. याचा अर्थ असा की जन्मापासून मृत्यु पर्यंत आपण संवाद करत असतो; परंतु समाजात वावरण्यासाठी इतर ज्ञानकौशल्यांचे शिक्षण देत असतांना संवादकौशल्याचे शिक्षण जाणीव पूर्वक होत असताना दिसत नाहीं. त्यांना गृहीत धरले जाते. संवादकौशल्यातील एक महत्वाचे कौशल्य म्हणजे ऐकण्याची कला. आपले कान ऐकण्याचे तांत्रिक काम करतात; परंतु त्यांची क्षमता आपण पूर्णपणे वापरत नाही. कान मिनिटाला ५०० ते ६०० शब्द ऐकू शकतात. मानवी बोलण्याचा वेग जास्तीत जास्त १२० ते १४० शब्द इतकाच असतो या मुळे ऐकता ऐकता आपण अनेक गोष्टी करू शकतो. ऐकणे म्हणजे फक्त शब्द ऐकणे नव्हे, तर या शब्दांच्या फेकी बरोबर बोलणा-या व्यक्तिच्या भावभावनांचे, हेतुंचे, व्यक्तिमत्वाचे आकलन म्हणजे ऐकणे. यासाठी केवळ कानांनी नव्हे तर आपल्या पंचांगांनी ऐकण्याच्या क्रियेमध्ये गुंतणे आवश्यक असते. एक लहान उदाहरण म्हणजे बोलते शब्द रागाचे, शिवीगाळीने भरलेले असूनही त्यातून प्रेम, आपुलकी, काळजी व्यक्त होऊ शकते; या उलट वरकरणी साध्या वाटणा-या शब्दांचा अर्थ अनेकदा वेगळाच असतो. म्हणून संपूर्णातून आकलनाचे व या आकलनाच्या reality check मधून आपले ऐकण्याचे कौशल्य वृध्दिंगत करणे गरजेचे आहे.
बोलणें हा संवाद कौशल्यचा दुसरा महात्वाचा पैलू. ऐकण्याचा अभाव जेवढा प्रचलित आहे तेवढाच बोलण्याचा अतिवापर. बोलण्याचे कौशल्य विकसित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे मर्यादा. याचा अर्थ अळी मिळी गुप चिळी असा नाहीं, तर व्यवस्थित ऐकून, समयोचित, प्रसंगोचित व व्यक्तिनुरूप बोलणे असा होतो. भाषा हे माध्यम आहे याची जाण ठेवून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे मनांत ठरवून बोललो तर बोलणे निश्चित अधिक प्रभावी होते. समोरील व्यक्तिंना समजून घेऊन त्यानुसार आपल्या बोलण्याला आकार देणे तर फारच उत्तम.
नवीन संवाद माध्यमे आपल्याला नवनवीन आव्हाने देतात. जसे दूरध्वनी बोलण्याचे व कानानी ऐकण्याचे कौशल्य पणाला लावतो. अनेकजण दूरध्वनीवरून बोलताना हातवारे करतात; कोणाला पत्ता सांगताना हातात दिशानिर्देश देतात.. टेलीफोन या साधनास सम्पूर्ण व्यक्ति न दिसण्याच्या मर्यादा आहेत, त्याचा विचार करून आपण बोलायला हवे. व्हीडिओ, इन्टरनेट इत्यादि अनेक साधने आता प्रचलित हत आहेत. संवादकौशल्याला नित्य नवीन आव्हाने देत आहेत. या आव्हानांना सामोरी जात असतांनाच ऐकणे व बोलणे या मूलभूत कसबांच्या जोपासनेतूनच आपण आपले व्यक्तिमत्व आणि नाती अधिक विकसित करू शकू.

-डॉ. अमृता भिडे
(संकलित)

लेबल:

 
प्रेषक : साईट प्रबंधन सोमवार, 19 मार्च 2007 4:23 pm.